वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाय नियोजनासाठी अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक
नवी दिल्ली : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांना ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजनांच्या तयारीचा आढावा घेतला. हे वादळ ३ जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पूर्व तयारीसाठी आतापासूनच सुरुवात केली आहे.
अरबी समुद्रात वादळाची स्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने महाराष्ट्रात एकूण ९ तुकड्या तैनात केल्या आहेत, ज्यापैकी मुंबईत ३, पालघरमध्ये २, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली.