विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार : उदय सामंत

08 May 2020 14:17:13

uday samant_1  



अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्षात ढकलणार


मुंबई : विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून संवाद विद्यार्थ्यांशी साधला आहे. काही दिवसांपूर्वीच युजीसीने एक अहवाल जाहीर करत देशभरात विद्यापीठांच्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. त्यानुसार परीक्षांबाबतीत आता महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. अंतिम वर्गाची अंतिम सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड आणि मार्क्स यांच्या ताळमेळ साधत विशेष गुणपद्धती दिली जाईल.


मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई विद्यापीठामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यांचे सर्वोत्तम मार्क निवडून ग्रेडिंग ठरवले जाईल. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार होईल. १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै महिन्यात सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सीईटीच्या युजीच्या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान, तर सीईटीच्या पीजीच्या परीक्षा २३ ते ३० जुलै दरम्यान घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


विद्यार्थ्यांना काही प्रश्न असल्यास त्यांनी संबंधित विद्यापीठाशी बोलावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहता आता राज्य सरकार युजीसीने दिलेल्या गाईडलाईननुसार १ ते ३१ जुलै दरम्यान परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


आज उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सीईटी परीक्षांच्या प्रवेशप्रक्रियेचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती, तर काही दिवसांपूर्वीच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक जेईई मेन आणि अ‍ॅडव्हान्स परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनमध्येही १०,१२ वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकाल देखील १० जूनपर्यंत लागू शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे.



Powered By Sangraha 9.0