कोरोनाच्या भीतीने वटवाघळांना मारल्यास 'या' राज्यांमध्ये होणार कारवाई

08 May 2020 14:49:56
bat _1  H x W:
 
 
 

अनेक राज्यांमधून वटवाघळांच्या शिकारीच्या घटना समोर येत आहेत

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाच्या संक्रमणाला कारणीभूत धरुन आज अनेक राज्यांमध्ये वटवाघळांना मारण्यात येत आहे. मात्र, यापुढे वटवाघळांना मारल्यास किंवा त्यांना इजा पोहोचवल्यास त्या व्यक्तींविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कर्नाटक आणि राजस्थान वन विभागाने वटवाघळांना मारणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
 
वटवाघूळ हा जगातील एकमेव उडणारा सस्तन प्राणी आहे. जगभरात वटवाघळांच्या १०१३ जाती आहेत. त्यापैकी भारतात १२३ जाती आढळतात. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक वटवाघळांच्या प्रजातींचा अधिवास आहे. यामधील २० टक्के वटवाघळे ही फलाहारी आहेत आणि ८० टक्के कीटकभक्षी. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संक्रमणाला वटवाघळाला दोषी ठरविले जात आहे. मात्र, अजूनही तसे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. असे असूनही गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानच्या चार जिल्ह्यांमधील ग्रामस्थांनी २०० हून अधिक वटवाघळांचा जीव घेतला आहे. चूरू, सीकर, झुंझुनू आणि नागौर जिल्ह्यातील जुनी स्मारके आणि बंगाल्यांमध्ये असणाऱ्या वटवाघळांना कोरोना संक्रमणाच्या भीतीने ग्रामस्थांनी मारुन टाकले.
 
 
 
 
 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत चौथ्या श्रेणीत वटवाघळांना संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या जीव घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद नाही. परंतु, आता राजस्थान वन विभागाकडून वटवाघळांना मारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी घेतला आहे. असाच निर्णय काही दिवसांपूर्वी कर्नाटक वन विभागाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने (आयसीएमआर) प्रसिद्ध केलेल्या अहवालात दक्षिण भारतातील काही वटवाघळांमध्ये कोरोना सदृश विषाणू आढळल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी या विषाणूंचा माणसांमध्ये आढळलेल्या 'कोव्हिड-19' विषाणूंशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. वटवाघळांमधून माणसांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे किंवा त्यांच्या मलमूत्रामार्गे माणसाला कोरोनाची बाधा झाल्याचे अजूनही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
 
 
 
 
वटवाघूळ आणि मिथक
 
 
 
वटवाघूळ हा निरुपयोगी प्राणी आहे ?
 
वटवाघूळ हापर्यावरणीय संस्थेतील महत्त्वाचा प्राणी आहे. फलहारीवटवटवाघांमुळे फळझाडांच्या बिया आणि परागकणांचा प्रसार होतो. जंगलांच्यापुनरुज्जीवनासाठी त्याची आवश्यकता असते. कीटक भक्षीवटवाघळांमुळे कीटकांची संख्या नियंत्रणात राहते.
 
 
 
वटवाघूळ माणसांवर हल्ला करतो ?
 
वटवाघळे माणसांवर हल्ला करीत नाहीत किंवा डोळेही काढून नेत नाहीत. माणसांपेक्षा आकाराने दहापट लहान असणार्‍या या प्राण्यांची माणसावर हल्ला करण्याची क्षमता नसते.
 
 
 
 
वटवाघूळ माणसाचे रक्त पितो ?
 
दक्षिण अमेरिका आणि मेस्किकोमध्ये आढळून येणारी रक्तशोषक वटवाघळे केवळ प्राण्यांचे रक्त पितात. मनुष्याचे नाही. तेआपल्या दातांनी प्राण्याच्या शरीरावर छोटासा दंशकरतात. त्यातून रक्त साकळनरोधी (अँटीकाँग्युलंट) द्रव्य सोडतात. त्यानंतर त्या प्राण्यांच्यारक्ताचे शोषण करतात आणि हे त्या प्राण्याच्या लक्षातही येत नाही.
Powered By Sangraha 9.0