२० दिवसांनी गृहमंत्री गडचिंचलेत; पत्रकारांना प्रवेश नाकारला
@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@
07-May-2020
Total Views |
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मात्र, प्रवेश : पत्रकारांना पोलीसांनी रोखले
पालघर : गडचिंचलेत साधूंच्या निघृण हत्येनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २० दिवसांनी भेट दिली. मात्र, या भेटीत त्यांनी पत्रकारांना गावात प्रवेश नाकारला तसेच याबद्दलची कुठलीही माहिती पत्रकारांना दिली नाही. प्रसार माध्यमांना चित्रिकरण आणि वृत्तांकन करण्यास नकार दिला, यामुळे पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. पालघरमध्ये ज्या गडचिंचलीत साधूंची जमावाकडून हत्या झाली त्या ठिकाणी गुरुवारी सकाळी ११ वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा पोहोचला. कासा पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायत कार्यालयात ते पोहोचले. यावेळी त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सभापती काशीनाथ चौधरी, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, खासदार राजेंद्र गावित आणि स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
गृहमंत्री आणि कार्यकर्त्यांना गावात सोडण्यात आले. मात्र, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलीसांनी काही अंतरावरच रोखले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी एक न्याय आणि पत्रकारांना वेगळा न्याय का, असा संतत्प सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान, आत्तापर्यंत एकूण ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकूण नऊ अल्पवयीन आहेत. कासा पोलीस ठाण्यातील दोन वरीष्ठ अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच अन्य ३५ पोलीसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पत्रकारांना सुरुवातीपासूनच दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने निषेध व्यक्त केला जात आहे.
"गृहमंत्र्यांचा आजचा दौरा म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. ज्या घटनेमुळे अवघा देश हादरून गेला, त्या घटनेनंतर तब्बल पाऊण महिन्यानंतर गृहमंत्री या घटनास्थळी दाखल होतात. या बद्दल पत्रकार विचारणा करणार याची माहिती असल्यानेच त्यांनी प्रवेश नाकारला. याऊलट त्यांच्या कार्यकर्त्यांना मोकळीक देण्यात आली. पोलीसांनी काशीनाथ चौधरी यांची चौकशी केली नाही. आम्हाला या जागी फिरण्यास बंदी आहे. मात्र, त्यांच्यासोबत असलेली कार्यकर्ता मंडळी तिथे फिरत असतात. पोलीसांवर कारवाई करण्यास दबाव टाकणाऱ्यांची चौकशी का होत नाही, असे अनेक प्रश्न पत्रकार विचारतील त्यामुळे हा प्रवेश नाकारला आहे."