तथागतांचा ‘धम्म’ हा ‘धर्म’ म्हणून प्रत्यक्षात आचरणात आणणारे जर कुणी आहेत, तर ते आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवकच! बुद्धांचा अजरामर उपदेश आणि रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे नाते मला नेहमीच जाणवते. आज तथागत गौतम बुद्धांची जयंती आहे. त्यानिमित्ताने बुद्धांचा उपदेश आणि संघ स्वयंसेवकांचे कार्य याचा घेतलेला मागोवा.
गौतम बुद्ध उपदेश करण्यासाठी एका शहरातून दुसर्या शहरात मार्गस्थ होत. असेच एका शहरात ते शिष्यांसह थांबले. एक शिष्य लोकांना भेटण्यास गेला. परतल्यावर तो तथागत भगवान बुद्धांना म्हणतो, “भगवन, या शहरातून प्रस्थान करूया. या शहरात अजिबात राहायचे नाही. इथली लोक अत्यंत वाईट आहेत. मी आज शहरात गेलो, तर कुणीही माझ्याशी चांगले वागले नाही. अपशब्द वापरले, मला त्रास दिला. या शहरातली लोक वाईट आहेत.” यावर भगवान म्हणतात, “मग कोणत्या शहरातली लोकं चांगली आहेत? आपण संत आहोत. लोक चांगले-वाईट आहेत म्हणून शहरात राहायचे किंवा नाही राहायचे, असा विचारच करू नये. उलट आपण याच शहरात काही काळ राहूया. आपण या सगळ्यांशी इतके चांगले वर्तन करूया की, या शहरातील सगळ्यांना वाईट वर्तन करावेसेच वाटणार नाही. लोकं वाईट नाहीत, तर प्रवृत्ती वाईट आहे. लोकांच्या वाईट प्रवृत्तीचा जोपर्यंत चांगल्या प्रवृत्तीत बदल होत नाही, तोपर्यंत हे शहर सोडण्याचा विचारही करू नये.”
गौतम बुद्धांची ही कथा. ही कथा वाचली आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. अत्यंत दुर्गम, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शून्यातून कार्य उभे करणारे ते प्रचारक ते स्वयंसेवक. उदाहरणार्थ केरळ, काश्मीर अगदी ईशान्य भारतही, या ठिकाणी संघाचे प्रचारक म्हणून काम करणे म्हणजे सुळावरची पोळी. प्रचारकांनीच का स्वयंसेवकांनीही समाजकार्य करणे म्हणजे जीव धोक्यात घालणेच. पण, कोणी निंदा-वंदा अगदी हल्ला करा, जीव घ्या, तरीही प्रचारक सर्वार्थाने प्रतिकूल असलेल्या शहरात जातात. काम करतात. कितीतरी वेळा अपमान आणि भयंकर परिस्थितीशी सामना त्यांना करावाच लागतो. काश्मीर, केरळ आणि पश्चिम बंगालचे उदाहरण ताजे आहेत. रा. स्व. संघाचे काम करतो म्हणून ठार मारले गेलेले स्वयंसेवक. असे अगणित स्वयंसेवक मृत्युमुखी पडले, पण मरेपर्यंत त्यांनी त्यांचे समाजकार्य सोडले नाही. उलट पूर, भूकंप आणि आणखीन नैसर्गिक-भौतिक संकटांमध्ये स्थानिकांना मदत करायला पुढे सरसावले ते स्वयंसेवकच! मला वाटते, गौतम बुद्धांच्या वरील कथेत आणि स्वयंसेवकांच्या जीवनसूत्रात हेच साम्य आहे.
गौतम बुद्धांचा ‘धम्म’ ‘करूणा’ सांगतो. ‘करूणा’ जी माणसाच्या दु:खाचा समूळ विचार करते. आज रा. स्व. संघाशी संबंधित संस्थांची आणि माणसांचीही कामे पाहिली तर जाणवते की, या सर्वांच्या मुळाशी करूणाच आहे. आपल्या बांधवाचे दु:ख कसे कमी होईल, यासाठीची ती करूणा. यासाठीचे उदाहरण देताना मला एक-दोन वर्षांपूर्वीचा मुंबईमध्ये पालघर, नाशिक वगैरे ठिकाणाहून चालत आलेला वनवासी बांधवांचा मोर्चा आठवतो. हा मोर्चा भाकप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केला होता. हजारो वनवासी बांधव या मोर्चात सामील झाले होते. मोर्चा संपल्यावर या माणसांचे काय झाले? चालून चालून काही आजारी पडली, तीन चतुर्थांश लोकांच्या पायाला फोड आले. मोर्चा यशस्वी झाला. आता या लोकांची गरज मोर्चाच्या आयोजकांना वाटली नसावी. त्यामुळे मोर्च्यानंतर त्यांना कुणीही विचारले नाही. मात्र, या लोकांना जाताना अन्न, औषधे, मलमपट्टी करायला पुढे होते ते स्वयंसेवक! वर त्यांची ताकीदच होती की, याची बिल्कूल बातमी करु नका. पण, तथागतांच्या करूणेचा विचार करताना स्वयंसेवकांच्या या करूणेची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.
भगवान बुद्धांची एक कथा आजही आठवली की, तथागतांच्या उदात्त विचारांबद्दल मन आपोआप नतमस्तक होते. तथागत पाहतात की, एक मुलगी खूप अस्वस्थपणे धावते आहे. तिला तहान लागली आहे. ती तथागतांकडे पाणी मागते. तथागत तिला पाणी प्यायला देतात. करूणादायी वत्सल भावनेने ते तिला तिच्या अस्वस्थेचे कारण विचारतात. ती म्हणते, “मी अस्पृश्य आहे. पण ही गोष्ट लपवली. राजदरबारात गायन केले. राजाने मला कंठहार बक्षीस म्हणूनही दिला. पण, राजदरबाराला आता माहिती पडले की, मी अस्पृश्य आहे. ते मला मारायला येत आहे.” इतक्यात समोरून राजा काही सैनिकांसह येतो. तथागतांना पाहतो. त्यांच्या हातातले पाण्याचे भांडे पाहून राजाला वाटते, तथागतांना तहान लागली आहे. तो सोन्याच्या भांड्यातले केवडा आणि चंदनयुक्त पाणी तथागतांना देऊ पाहतो. तथागत ते पाणी नाकारतात. राजा पाहतो की, तथागतांनी त्या मुलीला पाणी प्यायला दिले. तेव्हा राजा म्हणतो, “तथागत, ती अस्पृश्य आहे. अछूत आहे.” तेव्हा तथागत म्हणतात, “राजा, ती अछूत नाही, तू अछूत आहेस, तू अस्पृश्य आहेस. तुझ्या मनात भेदभाव आणि हिंसा आहे. या मुलीला तू मारायला आलास का? काही वेळापूर्वी तर तू तिला कंठहार दिलास. याचा अर्थ तू माणसाला, त्यांच्या गुणांना पाहत नाहीस. तुझी दृष्टी समसमान नाही.”
राजा क्षमा मागून माघारी फिरतो. ही कथाही आज आठवते. कारण, आज कोरोनामुळे सगळे जग आपत्तीमध्ये आहे. जातपात, धर्म, वंश यापलीकडे जाऊन सगळेच कोरोना आपत्तीच्या विरोधात काम करत आहेत. झोपडपट्टी गरीब वगैरे वस्त्यांमध्ये साधनसामुग्री वाटत आहेत. पण, ज्यांची काही चूक नसतानाही समाजाने कायमच ज्यांना तिरस्कृत केले, असे तृतीयपंथी किंवा समाजातल्या काही महाभागांमुळेच ज्यांना देहविक्री करण्यास मजबूर व्हावे लागले, त्या देहविक्री करणार्या स्त्रिया यांना या संकटकाळी उदरनिर्वाह करणेही कठीणच होते. नव्हे, त्यांच्या वस्तीत इतरवेळी कुणीच जाणारे नव्हते. पण, या वस्तीत पोहोचले ते स्वयंसेवक. तेही कुठलाही बडेजाव न करता. कारण, बुद्धांची कथा की अस्पृश्य किंवा तिरस्कृत ते नाहीत. त्यांचा वापर केला जातो. त्यांना वापरणारे तिरस्कृत आहेत.
तथागतांनी विचार मांडला की, आपण नित्य नव्याने जन्म घेतो. कालचे आज नाही, आजचे उद्या नाही. त्यामुळे आजच्या काळाला अनुकूल असे जगणे हेच जगणे आहे. संघ स्वयंसेवकांच्या जीवनाकडे पाहिले तर हे निश्चितपणे जाणवते की, स्वयंसेवक आजच्या सामाजिक जगण्याला अनुकूल असेच विचार करतात आणि कार्य करतात. काल जी कार्यपद्धती होती, तीच आज असेल असे नाही, तर आज काय करू शकतो, त्यावर काम आधारित. मात्र, हे करत असताना कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, हा शिरस्ता.
ईशान्य भारतात काम करणार्या स्वयंसेवकांचा अनुभव सांगण्यासारखा. तिथे महाराष्ट्रातले काही स्वयंसेवक प्रचारक म्हणून गेले. या स्वयंसेवकांनी कधी मांसाहार केला नाही. पण, ईशान्य भारतातील एका घरी गेले. अर्थात संपर्क-समन्वयासाठी. तिथे जेवायला बसले. जेवण होते मांसाहार आणि तो मांसाहारही आपल्या कल्पनेपलीकडचा. स्वयंसेवकांच्या पोटात ढवळून आले. पण, समोरच यजमान इतक्या आदराने आणि आपुलकीने जेवण वाढत होते. तेव्हा, त्या कुटुंबीयांचा मान राखावा म्हणून त्या स्वयंसेवकाने दोन-तीन घास खाल्ले आणि ती माणसे आपलीशी झाली. ही परिस्थितीची अनुकूलता आणि जुळवून घेणे स्वयंसेवकांच्या स्वभावातच आहे. तथागत म्हणतात, ‘अत्तदीप भव.’ तुम्ही जे विचार कराल, तेच बनाल. आज रा. स्व. संघाच्या विविध संस्थांचे काम पाहिले की वाटते, या सगळ्या संघटना, संस्था कशा उभ्या राहिल्या, तर ‘अत्तदीप भव’ म्हणतच उभ्या राहिल्या. या समस्यांवर, आपणच मार्ग काढायचा. आपणच काम करायचे. तथागत गौतम बुद्धांचा ‘धम्म’ आज रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कृतीत आणि विचारात जगतात. तथागथांच्या विचारांची प्रेरणा अमर आहे. त्या प्रेरणेचे दूत म्हणून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत.
बुद्धम शरणं गच्छामि
संघम शरणं गच्छामि