मुस्लीम विचारवंतांनी एकत्र येऊन ‘सीएए’विरोधी मैदानात उतरण्याचे आवाहन ‘अल कायदा’ने केले आहे. त्यामुळे जफरुल खान यांच्या याच पठडीतल्या धमकीमागे ‘बोलविता धनी’ ‘अल कायदा’ तर नाही ना, याचा तपास करण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि ऑनलाईन विश्वात भारतात मुसलमानांवर कसे अन्याय, अत्याचार केले जातात, भारत कसा ‘इस्लामोफोबिक’ आहे, याचा जोरदार अपप्रचार सुरु आहे. त्यात अमेरिकेच्या धर्मस्वातंत्र्यासंबंधीच्या अहवालाने अधिकच खतपाणी घातले. त्यामुळे देश एकीकडे कोरोनाशी लढा देत असताना, मुद्दाम सरकारच्या प्रयत्नांना हरताळ फासण्यासाठी आता जिहादी शक्तींनी डोके वर काढलेले दिसते. ‘अल कायदा’ने मुसलमानांना उकसवण्यासाठी दिलेली धमकी ही त्याच अध्यायाचा पुढील भाग म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांत कुवेत, युएई यांसारखे अरबी देश भारतातील मुसलमानांच्या परिस्थितीबाबत चिंतातूर असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या.
पण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘अॅक्शन मोड’मध्ये येऊन या देशांशी संपर्क साधला. भारताविरोधात अशी कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचे त्यानंतर स्पष्टही झाले. ऑनलाईन बनवाबनवीचा हा डाव फसल्यानंतर सौदी अरब, येमेनमध्ये सक्रिय असलेल्या ‘अल कायदा’च्या गटाने आता थेट भारतीय मुसलमानांना चिथावणी देणारे आवाहन जारी केल्याने या षड्यंत्राच्या मूळापर्यंत जाण्याची गरज आहे. एवढेच नाही, तर अरबी ‘अल कायदा’ची ही ‘स्क्रीप्ट’ भारतातूनच लिहिली गेली नाही ना, याचाही तपास यंत्रणांना खोलवर जाऊन शोध घ्यावा लागेल. कारण, ‘तबलिगी’ जमातच्या प्रकरणानंतर भारतीय मुसलमानांना बदनाम करण्याचा डाव असल्याच्या जागतिक अफवांचे पीक उठवले गेले. त्याच अनुषंगाने थेट अरबीमुखाने ‘जिहाद’चे आवाहन केले, तर भारतीय मुस्लीम समाज त्याला अधिक गांभीर्याने घेईल आणि सरकार विरोधी कारवायांना बळ मिळेल, हाच यामागील सुप्त दुष्टहेतू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘अल कायदा’च्या तीन पानी आवाहनामध्ये ‘सीएए’ कायदा मुस्लीमविरोधी असून त्याविरोधात आवाज उठविणार्या मुस्लीम समुदायाचा आवाज दाबला जात असल्याचाही आरोप करण्यात आला असून भारताला याप्रकरणी अमेरिकेची फूस असल्याचा अजब तर्क लढवण्यात आला आहे. ‘अल कायदा’च्या या धमकीला भारत सरकार अजिबात भीक घालणार नसले तरी अशाप्रकारे ‘जिहाद’च्या नावाखाली भारतातील धार्मिक सलोखा बिघडवण्याची ही काही धर्मांधांची ‘जाहिलियत’ ठेचून काढायलाच हवी.
‘जिहाद’च्या नावाखाली या भारतभूमीवर आजवर कित्येक आघात झाले. पण, ही हिंदू संस्कृती आणि या संस्कृतीची मूळं आजही तितकीच जमिनीत घट्ट रुतलेली आहेत. आज या भारतमातेचे सुपुत्र तिच्या संरक्षणासाठी सीमेवर आणि देशात तैनात आहेत. तेव्हा, ‘जिहाद’च्या धमक्यांनी, अरब वर्चस्वाच्या लढाईने भारत घाबरणारा, पळ काढणारा नाही. भारतात ‘गंगाजमुना तहजीब’ आजही कायम आहे आणि म्हणूनच मुसलमान पूर्णत: सुरक्षितही आहेत. ‘उम्मा’, ‘जिहाद’च्या नावाखाली भारतीय मुसलमानांची माथी भडकाविण्यापेक्षा ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटना उघूर मुसलमानांच्या संरक्षणासाठी चीनविरोधात ‘जिहाद’ पुकारण्याची हिंमत दाखवतील काय? तेव्हा, या दहशतवादी संघटनांनी हे ध्यानात घ्यावे की, भारताला ‘जिहाद’च्या नावाखाली डोळे दाखवण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले. कारण, ‘जिहाद’चे जहरी जाळे आता इथे विणणे अशक्यच!