मुंबई : राज्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाने भयंकर परिस्थिती बनवली असतानाच दुसरीकडे राजकीय भूकंप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर रात्री त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतली. या दोन्ही भेटीनंतर राज्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शरद पवार यांच्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यात ठाकरे सरकार हे सपशेल अपयशी ठरते आहे. शिवाय रुग्णालये आणि विलगीकरण कक्षातील व्यवस्थापन याबद्दलदेखील राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी उपचार घेत असलेले रुग्ण करत आहेत. शिवाय स्थलांतरितांचे होणारे हाल, गोरगरिबांची होणारी गैरसोय अशा अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.