मुंबई : 'जेव्हा जनता संकटात असते तेव्हा राजाने घरात बसून जमत नाही. अम्फान चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकाता, ओदीशाचा आढावा घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निघाले आहेत. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आतातरी मुख्यमंत्री बाहेर पडणार का, असा प्रश्न नेटीझन्सतर्फे विचारला जात आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे आलेल्या अम्फान वादळाने उद्धस्त झालेल्या प.बंगालच्या येथील काही भागांचा दौरा केला. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवास केला आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री घरी बसून केवळ फेसबूक लाईव्ह करतात, अशी टीका भाजपतर्फे केली जात आहे.
"राजकारण करू नका याचा सरळ अर्थ हाच की आमच्या भोंगळ कारभाराची बोंब करु नका. आमच्यावर टीका न करता सहन करा सगळे ढकल गाडी सरकार, राजकारण करू नका, याचा सोपा अर्थ, रेशन घोटाळा, क्वारंटाईन सेंटर मध्ये घोटाळा केला, आमच्या कारभाराची बोंबाबंब करु नका, अशा परिस्थितिमध्ये साथ द्या, महाराष्ट्रात -कोरोना रूग्ण ४०,०००, मुख्यमंत्री महोदय घरात, कोरोना जनतेच्या दारात, राजकारण करू नका, असा टोला भाजपतर्फे लगावण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचा आरोप करत शुक्रवारी राज्यभर भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली आहेत. राज्याला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजप महाराष्ट्रतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही ४२ हजारांच्या घरात जाईल, अशी परिस्थिती आहे. राज्यात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत ४१ हजार ६४२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत २३४५ नवे कोरोना रुग्ण आढळले. आत्तापर्यंत १ हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.