नवी दिल्ली : सध्या देशभर क्रीडाजगतात कोरोना प्रादुर्भावामुळे शांत आहे. परंतु, क्रीडा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक खेळाडू तसेच काही संस्था वेगवेगळे प्रयोग करत सोशल मिडीयावर चाहत्यांशी कनेक्ट आहेत. अशामध्ये राजस्थान रॉयल्सच्या एका पॉडकास्टमध्ये भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने १३ वर्षांपूर्वीच्या भारत पाकमधील त्या ऐतिहासिक सामन्यातील विजयाचा एक क्षण समोर आणला. त्याने सांगितले की कसे भारताने पाकिस्तानचा सामना बरोबरीत आणून तो सामना बॉल आउटपर्यंत आणला आणि त्यामध्येही भारताने पाकिस्तानवर मात करत एक इतिहास रचला.
२००७मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामना हा ऐतिहासिक ठरला होता. साखळी फेरीत सामना बरोबरीत सुटल्यानंतर आयसीसीच्या तत्कालीन नियमानुसार बॉल आउटमध्ये भारतीय गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानला पराभूत केले. यामध्ये सहभागी झालेल्या रॉबिन उथप्पाने या विजयाचे श्रेय धोनीला दिले.
“त्यावेळी धोनीने सर्वात चांगली गोष्ट केली ती म्हणजे तो स्टम्पच्या मागे जाऊन उभा राहिला. पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलला ते समजले नाही, ज्यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांची संधी होती त्यावेळी तो यष्टीरक्षक ज्या जागेवर उभा राहतो तिकडे जाऊन उभा राहिला. पण धोनीने आपला हजरजबाबीपणा दाखवला, त्यामुळे आमचे काम अधिक सोपे झाले. आम्हाला फक्त धोनीच्या दिशेने बॉल टाकायचा होता आणि आम्ही ते केले.” धोनीच्या याच आयडियाच्या कल्पनेने भारताने पाकिस्तानवर मात केली होती.