मुंबई : भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून कोरोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसे अपयशी ठरले आहे? अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता. यावरून आता भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. “कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडत आहेत.” असे म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे.
“कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत एक नंबर वर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडत आहेत. संकटाचा मुकाबला करण्याची धमक नाही, लोकांच्या वेदना समजण्याइतपत संवेदनशीलता नाही. झेपत नाही हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही, मात्र विरोधकांना दोष देण्याचा निलाजरेपणा मात्र पुरेपूर आहे.” असे म्हणत भातखळकरांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.