नवी दिल्ली : भारतीय रेल्वे बोर्डातर्फे ३० जूनपर्यंतची सर्व तिकीटे रद्द करण्यात आली आहेत. या काळात केवळ श्रमिक रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. ३० जूनपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत होण्याचे कुठलेही चिन्ह सध्यातरी दिसत नाही. लॉकडाऊनपूर्वी प्रवाशांनी बूक केलेल्या तिकीटांचे सर्व पैसे त्यांना परत केले जाणार आहेत.
वातानुकूलीत सेवा सुरू केल्यानंतर लवकरच रेल्वे मेल आणि एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दिलेल्या निर्देशांनुसार, २२ मे पासून विशेष वातानुकूलीत रेल्वेसह प्रतीक्षा यादीत असणाऱ्या प्रवाशांसाठी इतर ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत.
आरएसी तिकिट आता दिली जाणार नाहीत. रेल्वेने केवळ प्रथम दर्जा एसीमध्ये २० आणि शयनयान कक्षात दोनशे पर्यंत प्रतीक्षाय यादीतील तिकीट आरक्षण करण्याची मुभा दिली आहे. चेअर कार, एग्झिक्युटीव्ह क्लास, सेकट आणि थर्ड एसी डब्यातील बुकींगही विशेष रेल्वेत केले जाऊ शकणार आहेत. १५ मे पासून तिकीट बुकींग केली जाणार आहे.
कोरोना संक्रमितांना मिळणार पूर्ण रीफंड
कोरोना संक्रमितांना रेल्व प्रवास करण्यापासून रोखले जात आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांना त्यांचे तिकीट रद्द केल्यानंतर पूर्ण रकमेचा परतावा दिला जाणार आहे. रेल्वेतर्फे या संदर्भातील निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. आरक्षित तिकीट असणाऱ्या एखाद्या प्रवाशाच्या स्क्रीनिंगमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याचे तिकीट रद्द केले जाणार आहे. रेल्वे त्याच्या तिकीटाची पूर्ण रक्कम परत करणार आहे.