भूमिपुत्रांसाठी गावाच्या वेशी आज बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परगावात अडकलेल्या आपल्या भूमिपुत्रासाठी ग्रामस्थांनी धावणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे भीषण संकट, ‘लॉकडाऊन’, संचारबंदी, बेरोजगारी आदी संकटांमध्ये इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील मूळ रहिवासी मुंबई भागात अडकलेले आहेत. हे ग्रामस्थ आपल्या परिवारासह कांचनगाव येथे येण्यासाठी आतुर झालेले आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कांचनगाव ग्रामस्थांनी गावात कोणाला सध्याच्या स्थितीत येऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाहेर राहणार्या गावकर्यांनी या परिस्थितीत आहे तिथेच राहावे म्हणून उपसरपंच सतीश गव्हाणे यांनी पुढाकार घेतला. गावातील सहकार्यांच्या मदतीने मुंबई भागात राहणार्या गावातल्या २० ते ३० कुटुंबांना मुबलक धान्य, जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला घरपोच करण्यात आला. यासह सर्वांशी संवाद साधून आधार देण्यात आला. मुंबईस्थित या कुटुंबांकडून संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्याकडून काळजी घेतली जात असली तरी त्यांना आपल्या स्वतःच्या कांचनगावची ओढ लागली आहे. मात्र, अशा भयाण परिस्थितीत कांचनगाव ग्रामस्थांनी गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या काळात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे उपसरपंच सतीश गव्हाणे यांना संबंधित कुटुंबे संपर्क साधत आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या कुटुंबांना सध्या जगण्याचे साधन नसल्याने उपासमारीची भीती असल्याचे गव्हाणे यांच्या लक्षात आले. म्हणूनच सर्व कुटुंबे गावाकडे यायला इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी कांचनगावातील ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह काही सहकार्यांच्या मदतीने संबंधित कुटुंबांना शाश्वत मदत करण्याचा निर्णय घेतला. सतीश गव्हाणे यांनी ग्रामस्थांकडून गहू, तांदूळ, बाजरी, डाळी, तेल आदींसह विविध जीवनावश्यक साहित्य संकलित केले. जगण्यासाठीचे विविध साहित्य आणि सर्व प्रकारचा भाजीपाला या उपक्रमात जमा करण्यात आला. संबंधित २० ते ३० कुटुंबांना मुंबईत जाऊन हे साहित्य वितरित करण्यासाठी साहित्य भरलेले वाहन निर्जंतुकीकरण करून वाटप करणार्यांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन थेट घरपोच वाटप केले. गावकर्यांच्या मदतीला गावकरीच धावून आल्याने गरजू कुटुंबांनी साश्रूनयनांनी उपसरपंच सतीश गव्हाणे यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. कोरोना हद्दपार झाल्यावर गावाला यावे असे आग्रहाने सांगत मदत देणार्या दूतांनी त्यांचा निरोप घेतला. परगावात आपल्या गावातील कुटुंबांचा आधार बनत खरे पालकत्व निभावले जात असल्याचेच हे उदाहरण!