नवी दिल्ली : १७ लाखहून अधिक मुलांचे पोट भरणाऱ्या ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ने कोरोना महामारीच्या संकटातही आपली सेवा अखंड सुरू ठेवली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एकूण ४ कोटी अन्नथाळी प्रवासी मजूर, श्रमिकांना वाढले आहे. १ कोटी ७२ लाख ३३ हजार ५३ भोजन थाळी तर ५ लाख ५७ हजार १८ अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्यात आली आहे. एका किटमध्ये ४२ ते ४८ लोकांसाठी अन्नसामग्री उपलब्ध असते.
अक्षय पात्र ही देशभरातील मुलांना अन्नदान करणारी सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे. देशभरातील सात राज्यांमध्ये ६ हजार ५०० शाळांमध्ये १७ लाख विद्यार्थ्यांना भोजन पुरवते. अक्षय पात्र योजनेला बीबीसी वर्ल्ड सर्विस ग्लोबल चॅम्पियनशिप पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार जगभरातील खाद्यान्न उत्पादन किंवा अन्नदान करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला जातो.
अक्षय पात्र फाऊंडेशनतर्फे पंजाब, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपूरा, ओदीशा आणि तेलंगणासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांत आपली सेवा दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रातील लेखात या संस्थेला बदनाम करण्याच प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी लेखक, वैज्ञानिक आनंद रंगनाथन यांनी जनतेला केलेल्या आवाहनातून ११ तासांत एकूण २१ लाख रुपयांचे दान गोळा झाले होते. काही मुलांनी आपल्या खाऊसाठी वाचवलेले पैसेही दान करत या बदनामीला उत्तर दिले होते.