मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुंबईमध्ये दारोदारी जाऊन कोरोनाची स्क्रीनिंग करण्यात, यावी अशा प्रकारची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. यावर हे शक्य नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. धारावी सारख्या अनेक झोपडपट्टी भागामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. धारावीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ९६२ रुग्ण आढळून आले असून यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशामध्ये मुंबईमध्ये भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने म्हंटले की, मुंबईतील लोकसंख्येची तुलना भिलवाड्याशी होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची चाचणी करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे.