मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीत तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही असताना काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मोठा पेच तयार झाल्याचे चित्र आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
“लोकं घरामध्ये बंद आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. अशावेळी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकमताने एक निवडणूक घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक लावणारे चित्र असेल. उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारच्या राजकारणात कधीही रस नव्हता आणि नाही. ते या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ आहेत.” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीसाठी आग्रही असलेल्या संजय राउत यांच्या या वक्तव्यावर आता अनेकांच्या भुवया पुन्हा उचावल्या आहेत. या आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाल असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. “ही निवडणूक बिनविरोध झाली तरच लढावी अशी त्यांची इच्छा आहे. निवडणुका लढायला आम्ही घाबरत नाही. पण ही वेळ निवडणुका लढण्याची नाही. सध्याची वेळ कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची आहे. आपण नाईलाज म्हणून ही निवडणूक घेत आहोत.” असेही त्यांनी पुढे सांगितले.