लासलगाव (समीर पठाण) : लासलगाव येथे मंगळवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या परिसरात कडकडीत लॉकडाऊन करण्यात आले आहे.करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपापले उद्योग तसेच दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे येथील बाजारपेठ थंडावली आहे. याचा परिणाम शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनावर देखील झाला आहे.
या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने येथील बाजार समिती सुद्धा बंद आहे तसेच वाहतूक बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा,टोमॅटो तसेच इतर कृषिमाल शेतकरी येथील बाजार पेठेत विक्री साठी आणण्यास असमर्थ असल्याने हा सर्व भाजीपाला व अन्य शेतमाल शेतात पडून असल्याने हा सर्व शेतमाल सडायला सुरवात झाली असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
देशभरात सर्वत्र कोरोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊन झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.शेतातून माल निघण्याचा कालावधी व कोरोना विषाणूमुळे झालेला लॉकडाऊन एकाच वेळी झाल्याने शेतीमालाचे नुकसान होत आहे.शेतकरी कांदा तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी सावकराकडून कर्ज घेतात.माल बाजारात विक्री केल्यानंतर मग सावकाराला पैसे देतात.परंतु या वर्षी सावकाराला पैसे कोठून द्यायचे हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.बांधावरील कांदा,भाजीपाला व इतर शेतमाल किती दिवस संभाळायचा,कारण हा शेतमाल जास्त दिवस टिकत नसून तो एका जागेवर राहील्यास सडत असल्याने या बाबत शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.