मुंबई : विधान परिषद निवडणूकांच्या जागांबाबत महाविकास आघाडीत सुरू असलेल्या मतभेदांवर अखेर तोडगा निघाला आहे. विधान परिषदेच्या सहाव्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटला आहे. बिनविरोध निवडणूक होणार असल्याने उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, सर्व पाच उमेदवार अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीने पाच जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यात राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोन आणि काँग्रेस एक, अशी उमेदवारांची संख्या आहे. भाजपतर्फे यापूर्वीच चार जागांसाठी अर्ज भरण्यात आला आहे.
२१ मे रोजी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्व पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण, यात आता महाविकास आघाडीमध्ये सहाव्या जागेवरुन वाद निर्माण झाला होता. महाविकास आघाडीकडून पाच जागा निश्चित होत असताना बिनविरोध निवडणुकीची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने सहाव्या जागेवरही उमेदवार देण्याचा आग्रह धरला होता. नेमके
याच कारणास्तव उद्धव ठाकरे नाराज दिसून आले.
काँग्रेस आपल्या सहाव्या उमेदवारीच्या मुद्यावर ठाम असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले होते. यानंतर 'असेच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही', असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिली होती. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे म्हणत सहाव्या जागेसाठी काँग्रेस उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे.