नवी दिल्ली : भारतातून मलेशियाला पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या ८ तब्लिगीना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. हे सर्व मलेशियाचे नागरिक आहेत. अटक करण्यात आलेले सर्व तब्लिगी जमातीचे सदस्य आहेत. या वरून हे सर्व या मरकझमध्ये सामील झाले असावेत असा त्यांच्यावर पोलिसांचा संशय आहे.
हे आठ जण मेलिंडो एअरवेजचे मलेशियाला जाणारे विमान पकडण्याच्या तयारीत होते. भारतात सध्या विमानांची सर्व उड्डाणे बंद आहेत. मात्र अडकलेल्या लोकांची सुटका करणाऱ्या विमानाने हे सर्व पळून जाणार होते, अशी माहिती मिळत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे आठ लोक दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात लपून बसले होते. त्यानंतर रविवारी देशातून पळून जाण्यासाठी ते दिल्ली विमानतळावर एकत्र झाले. सध्या या आठ जणांची चौकशी केली जात आहे, त्यानंतर या सर्वांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चौकशीनंतर दिल्ली पोलिस आणि आरोग्य विभाग त्यांच्यावर कारवाई करेल असे सांगण्यात येत आहे.
१८ मार्च रोजी दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात देशातील तसेच देशाबाहेरील सुमारे ३००० लोक उपस्थित होते. यामध्ये इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधील लोकांचा देखील समावेश होता. गेल्या आठवड्यात, लॉकडाऊन असूनही हजारो लोक मरकझमध्ये जमा झाले. त्यानंतर त्यांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी मरकझच्या इमारतीमधून सुमारे २३०० लोकांना काढण्यात आले. आतापर्यंत १००० हून अधिक तब्लिगी लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मरकझच्या इमारतीसह संपूर्ण निजामुद्दीनवर भाग सध्या सील करण्यात आला आहे.