हैदराबाद : दिल्लीतील निझामुद्दीनच्या तब्लिगी जमातीच्या मरकझमध्ये देशभरातील तब्बल १३,७०२ लोक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आंध्र प्रदेश पोलिसांनी दिली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी ही संख्या मोबाइल टॉवरद्वारे प्राप्त केलेल्या विस्तृत विश्लेषणाच्या आधारे काढले आहेत.
ही संख्या स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचीच चिंता वाढली आहे. याचे कारण म्हणजे या १३,७०२ लोकांच्या संपर्कात किती लोक आले असतील हा प्रश्न आहे. शिवाय या १३,७०२ लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांना १४ दिवस क्वारंटीनमध्ये ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे.१३,७०२ लोकांपैकी ७,९३० लोक हे हाय रिस्कमध्ये आहेत. तर ज्यांना मध्यम स्वरुपाचा धोका आहे अशा लोकांची संख्या आहे ५,७७२ इतकी. जमातींची राज्यवार यादीही तयार करण्यात आली असून या यादीत उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही राज्ये सर्वात वरच्या स्थानी आहेत. या राज्यांमधील लोकांची संख्या जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये सर्वात जास्त आहे. याच कारणामुळे या राज्यांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.हे प्रकरण अतिशय गंभीर आणि फार मोठे असू शकते, तसेच यामुळे संपूर्ण देशभर करोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, असे संकेत तेलंगण आणि जम्मू-काश्मीरमधील काही लोकांच्या मृत्यूनंतर मिळत असल्याचे आयबीच्या एका अधिकाऱ्यानेही स्पष्ट केले होते.