परभणी जिल्ह्यातील मंगरूळ या गावातील एका तरुणाने आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकर्यांच्या मुलांना दत्तक घेऊन पुणे जिल्ह्यात भोसरी येथे ‘स्नेहवन’ ही संस्था सुरू केली. या मुलांना उत्तम शिक्षण, सोयीसुविधा देत मोठे करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इथे काम केले जाते.
तरुणाचं नाव आहे, अशोक बाबाराव देशमाने. यांचा जन्म झाला गरीब शेतकरी अशोक यांचा कुटुंबात. आई वडिलांनी कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं. एकूण तीन भावडं पण आजही आपल्याकडे मुलगा असेल तर शिक्षण द्यायचं आणि मुलगी असेल तर वयात आली की, लग्न करून देऊन मोकळ व्हायचं. त्याच प्रथेप्रमाणे अशोक यांना शिकवले गेले. कारण, तीन भावंडांमध्ये हे एकटेच मुलगा बाकी दोघी बहिणी कॉम्प्युटरमध्ये मास्टर्स केले. पण म्हणतात ना की, तरुण वयात मनावर जे संस्कार होतात ते आपल्याला पुढच्या आयुष्यात खूप काही करण्यासाठी बळ देतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अशोक देशमाने. कारण, कॉलेजमध्ये असताना स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांच्या विचारांनी भरावून गेले. वेळी कवितालेखनाचा छंद त्यांना जडला. मग कवितेतून ते व्यक्त होऊ लागले.
कवितेतून ते शेतकरी, शेती, यांच्या व्यथा मांडायचे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावात झालं. आठवी ते दहावी मात्र सात किलोमीटरवरील शाळेत कधी सायकल तर कधी मिळेल त्या वाहनाने जावे लागे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अशोक यांना एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये उत्तम पगाराची नोकरी लागली. पण त्याही वेळी त्यांना गाव गावातले लोक आठवायचे. त्यामुळे नोकरी लागल्यावर, त्यांनी पहिली गोष्टी केली ती म्हणजे आपल्या पगारातील दहा टक्के रक्कम ते पुण्यातील भटक्या विमुक्त लोकांच्या झोपड्यांमध्ये जाऊन काही मुलांना शिक्षण देण्यासाठी खर्च करू लागले. पण पुढे ही मुलं पालकांच्या सोबत दुसरीकडे स्थलांतरित झाली आणि हे काम बंद झाले. पण आतून असलेली तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांचे आदर्श असलेले विकास आमटे यांची त्यांनी भेट घेतली आणि त्या चर्चेनंतर त्यांनी शेतकर्यांच्या मुलांसाठी काम करण्याचे ठरवले.
आता यात कोणत्या मुलांसाठी हे काम करायचं तर प्राधान्य होते ते आत्महत्याग्रस्त किंवा कर्जबाजारी झालेले शेतकरी कुटुंब. त्याचबरोबर ऊसतोड कामगार किंवा आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झालेलं कुटुंब अशा कुटुंबांना प्राधान्य दिले गेले. हे सर्व करत असताना एका बाजूला नोकरी सुरु होतीच. रात्रपाळीत कंपनीत नोकरी करून ते मराठवाडा, बीड, परभणी, वाशीम, जालना अशा भागात फिरून गरजू कुटुंबांचा शोध घेत होते. आज अशाच कुटुंबातील २५ मुलांना त्यांनी दत्तक घेतले आहे. त्यांच्यासाठी ‘स्नेहवन’ सुरू केले आहे. पण मग हे करताना लक्षात आले की, आता पूर्णवेळ यासाठी देणे आवश्यक आहे. नोकरी आणि ‘स्नेहवन’ दोन्ही एकाच वेळी करणे सोपे नाही. शक्य नाही. त्यावेळी मात्र साधारण ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक लोकांना तो चुकीचादेखील वाटला. पण अशोक यांनी घेतलेलं हे व्रत, हा वसा टाकला नाही, ध्यास होता तो पूर्ण केला.
डिसेंबर २०१५ मध्ये संस्था रजिस्टर केली. सुरुवातीला नोकरी सोडून यात वाहून घेण्याच्या त्यांच्या निर्णयाला आई-वडिलांचा पूर्ण विरोध होता. पण आपल्या मुलाच्या सामाजिक जाणिवा पाहून त्याबद्दल असलेली तळमळ पाहून त्यांनी मुलाला यामध्ये संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले. आपलं गाव-शेती सारे काही सोडून ते मुलाजवळ राहायला आले. सुरुवातीला १८ मुले ‘स्नेहवन’मध्ये होती. त्यांचे सगळे जेवण-खाणे त्यांची आई करत असे. वडील वारकरी संप्रदायातील असल्याने मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी त्याचबरोबर आजोबांचा सहवास माया ते देतात. हे सारे करत असताना मुख्य प्रश्न होता तो भांडवलाचा. पण खूप दानशूर लोकांनी त्यांना मदत केली आणि ‘स्नेहवन’ उभे राहिले. मुलाला नोकरी उत्तम आहे. सगळं काही नीट आहे म्हटल्यावर प्रत्येक आई-वडिलांना वाटते तसेच अशोक यांच्या घरीदेखील त्यांच्या लग्नाचा विषय सुरु झाला होता. पण अशोक यांनी विचार केला की, लग्न झाल्यावर आपण नोकरी सोडली तर त्या मुलीला फसवल्यासारखे होईल. म्हणून मुलीला आधीच सगळे सांगून मग लग्न करावे आणि त्यांनी तेच केले. अर्चना नावाच्या मुलीला ते बघायला गेले तेव्हा त्यांनी तिला या सर्वाची कल्पना दिली आणि ती मुलगीदेखील तयार झाली. आज जवळ जवळ ५० मुलांना ही माऊली सांभाळते आहे. आपल्या जोडीदाराला तेवढीच मनापासून साथ देणारा जोडीदार भेटला की खूप सारे मानसिक बळ मिळते आणि याबाबत अशोक हे नशीबवान ठरले.
नुसते शेतकरी घरातील मुलांसाठी काम करून हे ‘स्नेहवन’ थांबलं नाही तर आजूबाजूच्या झोपड्यातील पंधरा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. ज्या मुली कचरा गोळा करायच्या. त्यांच्या आयुष्यात ‘स्नेहवन’मुळे एक आशेचा किरण दिसू लागला आहे. आज या ८० मुलांना अर्चना आणि अशोक यांच्या रुपात आईवडील लाभले आहेत. इथे फक्त मुलांना शिक्षण दिले जात नाही, तर त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. त्यांना स्वावलंबी केले जाते. इथला सातवीमध्ये शिकणारा ओंकार उत्तम कूक आहे. तो काही लोकांचा स्वयंपाक अगदी उत्तम आणि पटकन तयार करू शकतो. दुसरा एक मुलगा सुंदर गाणे गातो. काही मुलांना वाचनाचे वेड आहे. काही अतिशय सुंदर सूर्यनमस्कार घालतात. काही जण तर कविता-अभंग सादर करतात. वाचाल तर वाचाल हे लक्षात घेऊन ‘स्नेहवन’ मध्ये चार हजार, पुस्तकांचे वाचनालय तयार केले गेले आहे. इथे ‘वन बुक वन मुव्ही’ अशी संकल्पना राबवली जाते. म्हणजे मुलांनी कोणत्याही एका विषयावरचे पुस्तक वाचायचे आणि आठवड्यातून एकदाच आवडीचा सिनेमा पाहायचा. यातून वाचनदेखील होते आणि मुलांचे मनोरंजनदेखील होते. त्याचबरोबर भरपूर खेळ, मूल्यशिक्षण यावरदेखील इथे भर दिला जातो. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अशोक यांच्या परिवाराचा वेगळा स्वयंपाक नसतो. हे सर्व एकच कुटुंब आहे. आणि एकत्रच जेवतात. एकत्रच राहतात. आणि या सगळ्यात त्यांना त्यांची पत्नीची पूर्ण साथ आहे.
याच काळात या दाम्पत्याला मुलाची नुकती चाहूल लागली होती. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि शाळेचे डबे बनवून झाल्यावर गर्भवती अर्चना नियमित तपासण्यांसाठी भोसरीतल्याच डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कुलकर्णींच्या दवाखान्यात जायच्या. पहिल्या बाळंतपणासाठी दवाखान्यात आलेली ही मुलगी पंचविशीतील, पन्नास लेकरांचे आईपण हसतमुखाने पेलवतेय, हे समजल्यावर डॉक्टर कुलकर्णीं दाम्पत्य भारावून गेले. ‘स्नेहवन’ची माहिती घेतानाच अशोक यांनी डॉक्टर कुलकर्णींसमोर आपले स्वप्न मांडले आणि आळंदी-वडगाव रोडवर कोयाळी फाट्याजवळील आपल्या आठ एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन ‘स्नेहवन’ला देण्याचे डॉ. रवींद्र कुलकर्णींनी ठरविले. पुढच्या काही दिवसांतच दोन एकर जागा ९९ वर्षांच्या कराराने ‘स्नेहवन’च्या नावावर हस्तांतरित झाली होती. ‘स्नेहवन’च्या स्वप्नातली एक वास्तू कोयाळी फाट्यावरच्या दोन एकरांच्या परिसरात उभी राहिली आहे. ‘स्नेहवन’च्या या इमारतीत राहणार्या ५० मुलांची कहाणी जवळपास सारखीच आहे. कुणाच्या वडिलांनी आत्महत्या केलेली, कुणाचे वडील शेतमजुरी करत जगण्याशी झुंज देत आहेत, कुणाचे छत्र हरवले आहे.
अशा मुलांना आपल्या मायेची ग्वाही देऊन अशोक यांनी त्यांना ‘स्नेहवन’च्या सावलीत आणले. पहिली-दुसरीपासून बारावीपर्यंत शिकणारी ५० मुले आज ‘स्नेहवना’त सौख्याने वावरत आहेत. पहाटे ५ वाजता ‘स्नेहवन’चा दिवस सुरू होतो. आन्हिके आवरल्यावर प्रार्थना, योगाभ्यास, गृहपाठ आणि शाळेची तयारी सुरू होते, तेव्हा मुलांच्या नाश्त्याची आणि जेवणाच्या डब्यांसाठी अर्चना यांची लगबग सुरू असते. इथे ‘स्नेहवन’ची मुले समता विद्यालयात शकतात. सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार, मग अभ्यास झाल्यावर खाणे करून मुले शाळेत जातात. संध्याकाळी खेळ अभ्यास प्रार्थना होते. इथे मुलांचा आत्मविश्वास वाढवा म्हणून एक खेळ खेळला जातो. यात रिंगण करून त्यात मुलगा बसतो. त्यात कोणत्याही एका विषयावर त्याला बोलायला सांगितले जाते. त्यामुळे तो व्यक्त व्हायला शिकतो. त्याचबरोबर सभाधीट पणादेखील त्याच्यात येते. ही मुले कुठेही कमी पडू नयेत म्हणून इथे तो सर्व काळजी घेतली जाते. त्याचसोबत पारंपरिक खेळ, भजन, तबला, हार्मोनियम, कराटे, पेंटिंग, ध्यान, त्याच बरोबर त्यांना इथे संगणक प्रशिक्षणदेखील दिले जाते. त्याचबरोबर त्यांना इथे शेती शाळादेखील सुरू करायची आहे. इथे मुलेच सगळी डिपाटर्मेंट सांभाळतात. एकजण चार हजार पुस्तकांची लायब्ररी सांभाळतो. एकजण जेवणाचा विभाग सांभाळतो. एक जण जमाखर्च ताळेबंद सांभाळतो.
एकजण स्वच्छता सांभाळतो. म्हणजे पूर्ण घरात ही सगळी मुलंच जबाबदारीने काम करतात. यातून सामजिक कार्यकर्ते तयार होत जातात. त्यातून आत्मनिर्भरता, प्रामाणिकपणा विनयशीलता या सर्व गोष्टी कृतीतून इथे शिकवल्या जातात. एक उत्तम माणूस देशाचा नागरिक घडवण्याचा प्रयत्न यातून केला जातो. आता इथे छोटीशी गोशाळादेखील तयार केली गेली आहे. तसेच इथे बर्याच गोष्टी रिसायकल केल्या जातात. घरातलं कचरा, पाणी याचं व्यवस्थापन इथे केले जाते. त्याचबरोबर इथे लागणारा गॅसदेखील इथेच तयार केला जातो. इथे लागणारा भाजीपालादेखील इथेच तयार केला जातो. त्याचबरोबर प्रत्येक मुलाला इथे एक झाड दिले गेले आहे. त्या झाडाची त्या मुलाने काळजी घ्यायची. यातून निसर्ग संवर्धनदेखील शिकवले जाते आणि जबाबदारी घेऊन काम करण्याची सवयदेखील लागते. या कामात खूप लोकांची मदत होते. त्यातले डॉ. कुलकर्णीं यांनी मुख्य जागेची अडचण जागा देऊन दूर केली. त्याच बरोबर एका कंपनीने मुलांना शाळेत सोडायला आणायला एक गाडी दिली. या मुलांना त्यांना उद्योगधंद्याकडे वळवायचे आहे. शिकून फक्त नोकरी करू नये, तर आपल्या आपल्या गावात शेतीप्रधान काही उद्योग त्यांनी सुरु करावेत असे त्यांना वाटते. सध्या तिथे एकूण ८० मुलांची जबाबदारी ‘स्नेहवन’ने स्वीकारली आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, हे फक्त बोलून अशोक आणि अर्चना हे दोघे थांबले नाहीत, तर त्यांनी ते सत्यात आणले आहे. त्यांच्या या कार्याला सलाम.
- तनुजा इनामदार