नाशिक : राज्य सरकारने समृद्धी महामार्ग सारख्या कामाला पुन्हा गती दिली आहे. सुरक्षित वावर आणि कामगारांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊनच हे काम केले जात असून त्यामुळे बेरोजगार कामगारांनाही काम मिळाले आहे. समृद्धी महामार्ग हा राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा महामार्ग आहे.
भाजप प्रणित तत्कालीन फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या प्रकल्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. करोना संसर्गामुळे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला सर्व प्रकारची कामे बंद करण्यात आली वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली . विकास कामांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे . १४ एप्रिल पासून ही कामे सुरु करण्यात आली . परंतु अवघ्या पाच दहा टक्केच कामगारांच्या मदतीने काम सुरू करण्यात आले.
एकूणच विविध जिल्ह्यांमधील करोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन २० एप्रिल पासून काही सवलती लागू करण्याचा आणि निर्बंध उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा फायदा समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांना झाला असून ही कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. २० एप्रिल पासून ५० ते ६० टक्के मनुष्यबळाच्या आधारे ही कामे सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कामांसाठी स्थानिक स्तरावरच मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येत असून त्यामुळे गेली अनेक दिवस घरांमध्येच बसून असलेल्या आणि रोजगाराचे कोणतेही साधन नसलेल्या ग्रामीण भागातील काही लोकांना दिलासा मिळाला आहे . अशा कामगार, मजूर वर्गाला समृद्धी महामार्गाच्या उभारणीकरीता मदतीला घेण्यात आले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
कामगारांच्या सुरक्षेची काळजी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित वावर आवश्यक आहे . त्यामुळेच ही कामे सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थाना विश्वासात घेण्यात आले आहे . आसपासच्या गावातील लोकांनाच या कामावर रोजगार देण्यात आला आहे . त्यांना कामाच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी आणि पुन्हा त्यांना घरी सोडण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे .