तब्लीग-ए-जमातमध्ये रायगड जिल्ह्यातील ४० नाही, तर ६ जण सहभागी

02 Apr 2020 20:45:03
raigad_1  H x W
 
 
 

पनवेलमधील सहा जणांचे केले विलिगीकरण

मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातून तब्लीग-ए-जमातमध्ये उपस्थित असलेल्या ४० व्यक्ती रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, रायगड जिल्ह्यातील केवळ ६ नागरिकांनीच या मुस्लीम मेळाव्याला हजेरी लावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे विलिगीकरण करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
देशभरातून तब्लीग-ए-जमातमध्ये सहभागी झालेले काही व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे. यामुळे सर्वच राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्राचीही धाकधूक वाढली आहे. कारण, या मुस्लीम मेळाव्यामध्ये राज्यातील जवळपास हजारभर मु्स्लीम नागरिक सहभागी झाले होते. यामधील चाळीस जण रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राथमिक स्तरावर जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. मात्र, तपासणीनंतर यामधील केवळ सहा व्यक्ती रायगड जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
 
 
 
 
 
तब्लीग-ए-जमातमध्ये रायगड जिल्ह्यातील सहभागी असणाऱ्या चाळीस जणांच्या मोबाईल क्रमाकांची यादी आम्हाला राज्य सरकारकडून प्राप्त झाली होती, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. या यादीची तपासणी केल्यावर आम्हाला केवळ ६ जण रायगड जिल्ह्यातील पनवेलचे रहिवासी असल्याचे समजले. उर्वरित ३४ जण हे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. रायगड प्रशासनाने या ३४ जणांबाबतची माहिती संबंधित राज्याच्या प्रशासनापासून स्थानिक पोलीसांपर्यंत दिली आहे. तर रायगडमधील सहा जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0