कोल्हापूर : दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज भवनमध्ये झालेल्या तब्लिगी जमातीने आयोजित केलेल्या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जण उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने यांपैकी १० जणांना शोधून काढले असून त्यांचे क्वारंटाइन केल्याची माहिती आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
जगातील १५० पेक्षा अधिक देशांत पसरलेल्या तब्लिगी जमात या संघटनेने दि. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत दिल्लीतील मरकज भवनमध्ये धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते आणि नंतर देशात लॉकडाऊनचा निर्णय झाला.
सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. असे असूनही मरकज भवनमध्ये या आदेशाला हरताळ फासला गेल्याचे ३१ मार्च रोजी उघड झाले. इथे तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात विदेशातील मुल्ला-मौलवींनी सहभाग घेतल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजले. तसेच याच कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील मुस्लिम धर्मियांनीही उपस्थिती लावली होती. त्यातच कोल्हापूरचे २१ लोक हजर होते. दरम्यान, यांपैकी ९ जणांना अन्य राज्यांत क्वारंटाईन करण्यात आले असून उर्वरित १० जणांना कोल्हापूर प्रशासनाने शोधून काढले. परंतु, हे लोक १६ मार्चलाच परत आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन केल्याचे समजते.