मुंबई : जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. परंतु भारतात मात्र मागील दोन दिवसात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा आलेख उतरता असल्याची दिलासादायक माहिती समोर आली.कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत गेल्या तीन दिवसात बाधितांच्या संख्येत होणारी घट ही मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.
राज्यात ७ एप्रिलला १५० रुग्ण सापडले होते. त्यापैकी मुंबईत १०० होते. तेथून बाधितांचा आलेख वाढताच होता. ११ आणि १२ एप्रिल रोजी मुंबईत २०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र १३ एप्रिल रोजी हीच संख्या १५० पर्यंत खाली आली. १४ एप्रिल रोजी पुन्हा २०४ पर्यंत बाधित झाले. तर १५ एप्रिलला बाधितांची संख्या १८३ पर्यंत खाली आली. बाधित रुग्णांचा घटता आलेख लक्षात घेता डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच समाजातील सर्व स्तरातून होत असलेल्या प्रयत्नांना आलेले हे यश असल्याचे मानण्यात येत आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्याने या आठवड्यात चाचणीची पद्धत बदलली आहे. त्याचेच हे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गेले तीन दिवस ११ ते १५ दरम्यान असलेली मृतांची संख्या बुधवारी दोन पर्यंत खाली आली आहे. मुंबईत आतापर्यंत १९३६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८१ बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत मरण पावलेल्या रुग्णांपैकी अनेक जण जेष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना इतर आजारही होते, असे दिसून येत आहे. शिवाय दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजला जाऊन आलेल्या तबलिगींच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधााठी पालिका प्रशासनाची लढाई योग्य मार्गानेच चालल्याचे सिद्ध होत आहे.
कोरोना संसर्गित व्यक्ती स्वतःहून पालिकेकडे येईल आणि त्याच्यावर उपचार करण्यात येतील एवढ्यावरच पालिका प्रशासन थांबले नाही. तर रुग्णांचा आकडा वाढत जाताच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम पालिकेने हाती घेतली आणि त्यांना क्वारंटाईन केले. त्यामुळे रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसल्याचे दिसत आहेत.