लष्कर बोलवा ! कोरोना रोखण्यात सरकार अपयशी : नारायण राणे

16 Apr 2020 20:21:05
narayan_rane_1  

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे चित्र असले तरी ते नजीकच्या तीन-चार दिवसांमधले अधूनमधूनचे आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोनाबाधितांची आणि मृतांची संख्या ५० टक्क्याहून अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्यसरकारला पूर्णपणे अपयश आल्याचे त्यातून सिद्ध होते. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यात तातडीने लष्कर पाचारण करून करोनाचा प्रादुर्भाव रोखावा, अशी मागणी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी केली.
 
 
 
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीकाही केली. राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. इतर राज्यांनी जशी काळजी घेतली तशी काळजी महाराष्ट्रात घेण्यात आलेली नाही. कोरोनाबाधितांवर हवे तसे उपचार झालेले नाहीत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. केवळ आकडेवारी जाहीर केल्याने काम होत नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे सांगतानाच लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जात नाही, असे ते म्हणाले.
 
 
 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊननंतर आठवडाभरातच लष्कराला पाचारण करण्याचा इशारा दिला होता, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांनी शिस्त न पाळल्यास अधिक कठोर व्हावे लागेल, असे म्हटले होते. तो मुद्दा पकडून राणे म्हणाले की, लॉकडाऊनचे काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात लष्कर आणि होमगार्डला पाचारण करावे. म्हणजे लोक लॉकडाऊनचे पालन करतील आणि कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात घेटेल आणि राज्याचे जनजीवन सुरळीत होईल.
 
 
 
यावेळी त्यांनी वांद्रे येथील घटनेवरही भाष्य केले. लॉकडाऊन काळात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू असताना वांद्र्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमतातच कसे, असा सवाल करतानाच ते म्हणाले की, तीन-चार हजार लोक जमेपर्यंत सरकार वाट पाहत होते का? राज्याची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? वांद्रे येथे हजारोंच्या संख्येने लोक जमा होणे हे सरकारचे अपयश आहे, असेही ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0