कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व जनजीवन ठप्प झाले असतांनाच कल्याणकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या पत्रीपुलाचे काम मात्र सुरु झाल्याने कल्याणकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
तसेच संपूर्ण शासकीय, निमशासकीय यंत्रणा, खासगी, सामाजिक संस्था या कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहेत. तर या लॉकडाऊनचा परिणाम अनेक महत्वाच्या विकासकामांवरही होताना दिसत आहे. त्यातही विशेष करून पायाभूत सुविधांची सुरू असणारी कामांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. कल्याणातील वाहतूक सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील बनलेल्या पत्रीपुलाचे कामही कोरोनामुळे प्रभावित झाले होते.
मात्र सध्याचा लॉकडाऊन, मोकळे असणारे रस्ते आणि बंद असणारी रेल्वे वाहतूक ही पुलाचे काम गतीने होण्यासाठी अनुकूल अशीच आहे. त्यामुळे ५ दिवसांपूर्वीच याठिकाणी आवश्यक त्या गतीने हे काम पुन्हा सुरू झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम अशा दोन्ही बाजूने हे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच हे काम करणारे इंजिनिअर, कर्मचारी आपापल्या आरोग्याची योग्य ती खबरदारीही घेत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.