मुंबई : देशभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये एकूण ३००हून अधिक कोरोना बाधित आढळलेले आहेत तर फक्त मुंबईमध्येच हा आकडा १५०हुन अधिक आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे यांनी सांगितले की, “मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत”.