मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) वर आता कोरोना व्हायरसचे सावट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएलच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आयपीएलसारख्या मोठ्या कार्यक्रमास जाणे टाळावे यासाठी सरकार विचार करीत आहे. तर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा पुढे ढकलली जाणार नाही आणि वेळापत्रकानुसार आयपीएल सामन्याचे आयोजन केले जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे नक्की आयपीएल होणार की नाही याबाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "आधीच मोठ्या कार्यक्रमांना रद्द केले जात आहे. लोकांचे जीवन मौल्यवान आहे. गर्दीच्या ठिकाणी व्हायरस पसरण्याचा धोका खूप जास्त आहे. म्हणून आम्ही आयपीएल पुढे ढकलण्याच्या शक्यतेवर चर्चा करीत आहोत, आम्ही याबद्दल मत मागितले आहे." तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आयपीएल पुढे ढकलण्याच्या प्रश्नावर सौरव गांगुली यांनी उत्तर दिले आहे.
"आयपीएल पुढे ढकलली जाणार नाही आणि वेळापत्रकानुसार आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे." असे सौरव गांगुलींनी स्पष्ट केले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे की, "बीसीसीआयने आयपीएल बाबत आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. आयपीएल २०२० सुरूच राहिल आणि कोरोना व्हायरस संदर्भात सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील."