मुंबई : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरामध्ये हाहाकार माजला आहे. अनेक देशांवर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. याचे सावट आता आयपीएल आणि ऑलिंम्पिकवरही पडणार आहे. या व्हायरसमुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
भारतात देखील करोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात आता बीसीसीआयने अधिकृत मत व्यक्त केले आहे. बीसीसीआयचे सदस्य आणि आयपीएलच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य बृजेश पटेल यांनी स्पर्धेला करोना व्हायरसपासून कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे. या स्पर्धेला करोनापासून कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहोत. कोणत्याही खेळाडूला धोका नाही, असे पटेल यांनी माहिती दिली.
टोकियो ऑलिम्पिक वर्षभरात केव्हाही घेण्याचा निर्णय ‘करोना’चा धोका पाहून घेण्यात येऊ शकतो, असे जपानचे ऑलिम्पिकमंत्री सिको हॅशिमोटो यांनी स्पष्ट केले. जपानच्या संसदेत हॅशिमोटो यांनी हे स्पष्टीकरण दिले. "जर २०२० या संपूर्ण वर्षांत ऑलिम्पिक आयोजित केले नाही तरच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) जपानकडून यजमानपदाचे हक्क काढून घेऊ शकते. या स्थितीत जर ऑलिम्पिक पुढे ढकलला तर जपानकडून यजमानपदाचे हक्क काढले जाणार नाहीत,’’ असे हॅशिमोटो यांनी सांगितले.