कोरोना’चे संकट हे कायमस्वरूपी टिकणारे नसून आज ना उद्या ते जाणार आहे व पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास बाळगा. यामुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल
कोणतीही लढाई ही मैदानात जिंकण्या अगोदर ती मनात जिंकावी लागते. आज आपला देश अशाच एका लढाईतून जात आहे. ही लढाई दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा प्रसंगी आपण बाह्यनियमांचे (शासनाच्या) पालन करण्याबरोबरच आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करतो, त्यावर ही लढाई आपण कशी व केव्हा जिंकू, हे अवलंबून आहे. कोरोना आजाराच्या भितीमुळे जगभर माणसामध्ये एक औदासिन्य आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या भितीनेही खूप जण आजारी पडत आहेत. या भितीवरही आपण मात करू या..
कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला अनुसरून विविध भावना आपल्याला अनुभवास येत असतात, ज्यांद्वारे आपणांस त्या परिस्थितीचा सामना करणे सोयीचे ठरत असते. या भावना प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. एक, सकारात्मक भावना व दुसरे नकारात्मक भावना. धोकादायक परिस्थितीत नकारात्मक भावनांचा अनुभव अधिक येणे हे साहजिक असते. नकारात्मक भावनांमध्ये निराशा, दुःख, चिंता व भीती या प्रमुख भावनांचा समावेश होतो. या नकारात्मक भावनांच्या सतत अनुभवामुळे आपणास काही विपरीत परिणामांना सामोरे जावे लागते. ज्यात प्रामुख्याने नैराश्य, औदासिन्य, खालावलेले शारीरिक आरोग्य यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य यांमध्ये द्विमार्गी संबंध असल्याचे आढळून आले. जसा आपल्या शारीरिक आरोग्याचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो, तसाच आपल्या मनस्थितीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. कोरोना विषाणूच्या अनपेक्षित फैलावामुळे सर्व जगात भीतीचे वातावरण असताना भारतातदेखील काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा सततच्या भीतीच्या आणि तणावाच्या परिस्थितीमध्ये आपण नेमके कसे वागावे, हा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला असणार. बाह्यपरिस्थिती आपल्या हातात नसली तरी आपले मन मात्र आपल्या ताब्यात आहे. या मनावर आणि त्यात निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण प्राप्त झाल्यास ही गंभीर परिस्थिती आपणास सुसह्य बनू शकते. यासाठी मानसशास्त्रातील काही तंत्रांची आपणास मदत होऊ शकते. ही तंत्रे खालीलप्रमाणे.
अतिरेकी चिंता करू नका : चिंता म्हणजे भविष्याबद्दल जास्त प्रमाणात काळजी करणे होय. ही एक नकारात्मक मनस्थिती असून त्याद्वारे आपली रोगप्रतिकारक्षमता कमी होऊ शकते व पऱ्या याने संभाव्य संसर्गास तोंड देण्याची आपली क्षमता कमी होऊ शकते. उद्या काय होईल, याचा विचार करत बसण्यापेक्षा आज आपण काय करावे, जेणेकरून उद्याची विपरीत परिस्थिती निर्माण होणार नाही याचा आपण विचार करावा. अतिरेकी भीती बाळगणेसुद्धा आपल्या हिताचे नाही. भीतीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना आपणास धाडसाने करता येणार नाही. उलटपक्षी आपण संरक्षक बनून निष्क्रिय बनण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण घाबरून न जाता सक्रियपणे संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. आपण अधिकाधिक सकारात्मक विचार करून जीवनात आनंद, आशावादी वृत्ती व आपल्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टींवर नियंत्रणाची जाणीव ठेवल्यास आपली मनस्थिती चांगली राहण्याबरोबर आपली रोगप्रतिकारक्षमतादेखील वाढण्यास मदत होऊ शकते.
यासाठी जागृता ध्यान अर्थात ‘meditation’ यासारख्या तंत्राचा उपयोग होऊ शकतो. या तंत्रात भविष्याबद्दल अधिक विचार करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित केले जाते. भविष्य हे आपल्या नियंत्रणात नसल्यामुळे त्याबद्दल खूप विचार करणे निरुपयोगी ठरू शकते. वर्तमान हेच आपल्या हातात आहे व त्याचा उपयोग आपण कसा करायचा हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे आपल्या हातात असणाऱ्या वेळेचा अधिकाधिक सदुपयोग जसे - आपले अपूर्ण राहिलेले छंद, घरातील काम, मुलांबरोबर व परिवारातील इतर सदस्यांबरोबर वेळ घालवणे, व्यायाम करणे इ. करून आपण आपल्या वर्तमानावर नियंत्रण प्राप्त करू शकतो.
आशावादी दृष्टिकोन बाळगा : ‘कोरोना’चे संकट हे कायमस्वरूपी टिकणारे नसून आज ना उद्या ते जाणार आहे व पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास बाळगा. यामुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल
असाहाय्यता बाळगू नका : कोरोनाचे संकट जसे मानवामुळे व त्याच्या काही चुकांमुळे सर्वत्र पसरले आहे, तसेच त्याचे उच्चाटनदेखील मानव म्हणजे आपणच करू शकतो, अशी आशा बाळगा. सक्रीय कृतीतंत्रांचा वापर करा. अनेक व्यक्ती त्यांचा रिकामा वेळ निष्क्रिय मनोरंजनात जसे टीव्ही बघणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, जास्त प्रमाणात झोपणे, इंटरनेटचा अतिरेकी वापर करणे यांसारख्या गोष्टींमध्ये घालवत आहेत. त्याऐवजी अधिक सक्रीय कृती जसे शरीराची हालचाल होईल, असे खेळ खेळणे, वाचन करणे, लिखाण करणे, आपल्यातील नवनिर्मितीला वाव मिळेल अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. असे केल्यास सकारात्मक मनस्थिती निर्माण होण्यास मदत होईल.
बातम्या कमी बघणे : कोरोनाने जगात सर्वत्र थैमान घातले असल्यामुळे आपल्यापैकी बहुतांश व्यक्ती देशातील ताज्या घडामोडींसाठी सतत बातम्या बघत आहेत, ज्यांतील नकारात्मकता ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बातम्या सतत बघितल्याने त्यातील नकारात्मकता आपल्या वर्तनात (जसे चिडचिडेपणा, चिंता, उदासीनता, हतबलता इ.)देखील दिसून येऊ शकते. दिवसेंदिवस वाढत चाललेली विषाणूबाधितांची संख्या ही काळजीची बाब असली तरीही अशा बातम्यांसाठी आपण दिवसातील अर्धा तास बाजूला काढून ठेवायला हवा, जेणेकरून आपणास उरलेल्या वेळेचे नियोजन आपल्या कामासाठी करता येईल.
सौजन्य :
मानसशास्त्र विभाग,
भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक
खालीलपैकी कोणतीही लक्षणे आपल्यास आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
- सतत काहीतरी भयंकर घडेल असे वाटणे.
- झोप प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त येणे.
- हृदयाची धडधड वाढणे.
- भूक नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त लागणे.
- सतत डोके दुखणे.
- मनात नकारात्मक विचार येणे.
- आयुष्य संपवण्याचा विचार मनात येणे.
डॉ. डी. पी. पवार- 9922155418
सौ. शर्मिला भावसार - 8805362652
सौ. प्रियदर्शिनी कुलकर्णी- 9657744696
कु. मुग्धा जोशी - 9273763501