मरकझमधील धार्मिक सोहळ्याची दिल्ली प्रशासनाला माहिती ?

31 Mar 2020 18:36:58


delhi nizamuddin_1 &



नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे प्रयत्नशील असताना मात्र दिल्लीतील निजामुद्दीन येथील प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. निजामुद्दीन येथे तब्लीग-ए-जमातच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्ली प्रशासनावर  अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यानच्या काळात मरकझने खबरदारी घेण्यासाठी पोलिसांना पत्र लिहिले होते, अशी माहिती उघड झाली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे इथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी वाहनांचे पास मिळावेत अशी मागणी या पत्रात केली होती.



लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गरजवंतांना गरजेच्या वस्तू मिळाव्यात यासाठी दिल्ली सरकारकडून विशेष पास दिले जात होते. लॉकडाऊन असतानाही लोकांना प्रवास करता यावा हा त्यामागील उद्देश होता. १५ मार्च या दिवशी मरकझकडून दिल्ली पोलिसांना पत्र पाठवण्यात आले. मात्र त्याचे कोणतेही उत्तर आले नसल्याचे मरकझचे म्हणणे आहे. २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. या पार्श्वभूमीवर पत्राचा दावा खरा मानल्यास दिल्लीतील मरकजमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असणार याची माहिती प्रशासनाला होती. असे असतानाही मरकझमधील लोकांची सुटका करण्याची व्यवस्था का केली गेली नाही
, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.




मरकजतर्फे या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्यात आली आहे. ज्या दिवशी लॉकडाऊन घोषित करण्यात आला त्याच दिवशी मरकझमध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा आम्ही विचार केला होता. इथे असणाऱ्या लोकांची सुटका व्हावी यासाठी वाहनांना पास मिळले आवश्यक होते आणि त्यासाठी आम्ही तत्काळ पोलिसांना पत्र लिहिले असे मरकझकडून सांगण्यात येत आहे. आम्ही वाहनांची व्यवस्था करून ठेवली होती असेही मरकजचे म्हणणे आहे. आमच्याकडे असलेल्या सर्व वाहनांची यादी आम्ही दिल्ली पोलिसांना दिल्याचेही मरकजचे म्हणणे आहे.

delhi police_1  

 

Powered By Sangraha 9.0