लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही : राजीव गौबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

rajiv gauba_1  


कॅबिनेट सचिवांकडून लॉकडाऊन वाढवण्याच्या वृत्ताचे खंडन


 
दिल्ली : कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लोक आपल्याच घरात कैद आहेत. याचदरम्यान लोकांमध्ये आता लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यात मोठ्याप्रमाणात अफवाही पसरल्या आहेत. यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लॉकडाऊन वाढवले जाणार असल्याच्या वृत्तामुळे चकित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. आमची अशी कोणतीच योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनामध्ये लॉकडाऊन आणखी काही दिवस राहणार असल्याची अफवा पसवण्यात येत आहे. मात्र, आता यासंदर्भात राजीव गौबा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


दरम्यान, कोरोनाविषाणूमुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूमुळे जगात ३३००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकट्या यूरोपमध्ये २०००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगातील एकूण ७ लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. स्पेन आणि इटलीमध्ये एका दिवसांत ८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगातील एक तृतीयांश लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये आहे.


या विषाणूचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १४२००० हून प्रकरणे समोर आली आहेत. तर २४०० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. भारतातील कोरोनाबाधितांची संख्याही वाढून रविवारी १०००च्या वर गेली आहे. यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@