जग कोरोना संकटात असतानाही पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच!

30 Mar 2020 11:51:13

shah qureshi_1  


पाकिस्तानकडून पुन्हा एकदा काश्मिरच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांना पत्र


मुंबई : काश्मिरचा मुद्दा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे त्याच्याशी लढण्यात गुंतलेले असतानाही पाकिस्तानकडून पुन्हा एकदा काश्मिरचा मुद्दा उपस्थित कऱण्यात आला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांना एक पत्र लिहिले आहे.


पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडून या पत्राचा मजकूर रविवारी जाहीर करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांनाही पाकिस्तानने पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत अमानवीय झाली असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील कैद्यांची सुटका करण्याची त्याचबरोबर या राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.


शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला लिहिलेल्या पत्राला तूर्त तरी भारताकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा भारताचा निर्णय हा अंतर्गत प्रश्न आहे, असे भारताने आधीच पाकिस्तानला सुनावले आहे. त्याचबरोबर पाकिस्तान विनाकारण भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घालत असून, काश्मीरमधील दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0