मुंबई : देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता देशभर लॉकडाऊन जाहीर करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. अशामध्ये बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धेबद्दल निर्णय घेतला जाईल असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं होतं. मात्र, आता आयपीएलच रद्द होण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत अधिकृत रित्या बीसीसीआयने जाहीर केले नसले तरी सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये याबडत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलनंतर परदेशी खेळाडूंच्या व्हिसाबद्दल केंद्र सरकार काय निर्णय घेत यानंतर बीसीसीआय अधिकृत घोषणा करण्याचे संकेत मिळत आहेत. यंदाच्या हंगामाची स्पर्धा रद्द झाल्यास स्पर्धा थेट पुढील वर्षात खेळवण्यात येईल. त्यामुळे २०२१ साली प्रस्तावित लिलाव होणार नसल्याचेही सांगितले जात आहे. संघमालकांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा देण्यात येऊ शकते. यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आपल्या सर्व स्थानिक स्पर्धांचे सामनेही रद्द केले आहेत.