सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागणार
नवी दिल्ली : देशभरातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या मजूरांना १४ एप्रिलपर्यंत सीमेवरच राहावे लागणार आहे. हे मजूर जर आपापल्या गावी दाखल झाले तर तिथे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सर्व मजूरांना १४ दिवसांत विलगिकरण कक्षात (क्वारंटाइल) ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे शहरांतून मैलोंमैल प्रवास करुनही मजूरांना आता आपल्या घरी थेट पोहोचता येणार नाही. बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. या दरम्यान विलगिकरण कक्षात त्यांची राहण्याची तसेच खाण्यापिण्याचीही सोय केली जाणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुसऱ्या राज्यांतून बिहारमध्ये येणाऱ्यांना विलगिकरण कक्षातच ठेवले जाणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, "लोक आता जर घरी पोहोचणार असतील तर लॉकडाऊनचा काहीही उपयोग होणार नाही, हा विषाणू आणखी वेगाने पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आहात तिथेच थांबून आम्हाला सहकार्य करा."