मुंबई : कोरोनाच्या संकटात भारत चीनच्या मदतीविना चार महिन्यांपर्यंत औषधांचे उत्पादन करू शकतो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात औषधांच्या किंमती वाढण्याची कुठलीही शक्यता नाही. तसेच चीनहून यासाठी लागणारा कच्चा माल जलवाहतूक आणि हवाईमार्गानेही भारतात येणार आहे. इंडियन ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतात चीनहून येणारा हा कच्चा माल येण्याचा मार्ग खुला झाला आहे. हा माल १८ दिवसांत समुद्रीमार्गाने पोहोचतो. बंदरावर त्याला क्वारंटाईल केले जाते. यासाठाही कमी दिवस केले जातात. तसेच भारतात असा तीन ते चार महिन्यांचा कच्चा माल पूर्वीपासून आहे. त्यामुळे येत्या काळात औषधांचा तुटवडा भासणार नाही तसेच किंमतीही वाढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विमानाद्वारे येणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक सुरू झाली आहे. अधिक मुल्यवान असलेला कच्चा माल हवाई मार्गाने भारतात येतो. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे सध्या तीन ते चार महिने पुरेल असा कच्चा माल शिल्लक आहे. जाणकारांच्या मते भारतातील औषधांचे उत्पादन आणि पुरवठा नियमित सुरू राहणार आहे. तसेच केंद्र सरकार औषधांच्या किमती काही केल्या वाढू देणार नाही.
आयडीएएच्या माहितीनुसार, 'हायड्रोक्सी क्लोरोक्विन औषधाचा साठा करण्यास देशात सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा तुटवडा जाणवत होता. मात्र, कंपन्यांनीही पुन्हा या औषधांची निर्मिती केली आहे. मात्र, या औषधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. देशभरात लागणाऱ्या एकूण अॅटीबायोटीकपैकी ९० टक्के औषधे चीनहून येतात. तसेच पॅरासिटामोल हे चीनहून आयात केले जाणारे क्रमांक एकचे औषध आहे.'