नाशिक : पश्चिम बंगालमध्ये ऊरुससाठी नाशिकमधून गेलेले २५० पेक्षा जास्त भाविक लॉकडाऊनमुळे त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. २२ मार्चच्या रेल्वेने ते नाशिकला परतणार होते भाविकांमध्ये लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कोलकाता शहरानजीक पंडवा येथील दर्गाच्या ऊरुससाठी जुने नाशिक, खडकाळी, दूध बाजार , मदिना चौक आदी भागातील २००-२५० मुस्लिम भाविक १३ मार्चला नाशिकमधून रेल्वेने गेले होते. उरुस झाल्यावर २२ मार्चला रेल्वेने ते नाशिकला परतणार होते मात्र करोना संकटांच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहिर झाले त्यामुळे नाशिकचे भाविक तेथेच अडकून पडले आहेत.
शहनाज युसुफ़ कादरी या माजी आमदाराने भाविकांची राहण्याची व्यवस्था केल्याचे समजते भाविकांमध्ये वयोवृध्दांची संख्या जादा असून महिला व लहान मुलांच्या गर्दीमुळे काळजी वाढली आहे. त्यातील अनेकजण दमा, शुगरचे रुग्ण आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाविकांना नाशिकला पाठविण्याबाबत तेथील लोकप्रतिनिधीने राज्य शासनाशी संपर्क साधला. मात्र लॉकडाऊनमुळे शक्य नसल्याचे शासनाने कळवल्याचे समजते. महाराष्ट्र शासनाने याबाबत पुढाकार घेतला तर या भाविकांना सोडता येईल, असे तेथील प्रशासनाची भूमिका आहे.