गर्दी न टाळल्यास कठोर कारवाईचा इशारा ; मुख्यमंत्रीही संतापले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |

cm Thackeray _1 &nbs
मुंबई : राज्यामध्ये कोरोना संसर्गाचा तिसरा टप्पा सुरू झाला असतानाच लोकांना अजूनही गांभीर्य लक्षात येत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'अजूनही गर्दी न टाळल्यास कठोर पावले टाकायला भाग पाडू नका,' असा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'गर्दी कमी न झाल्यास लष्कराला पाचारण करावे लागेल' असा इशारा दिला होता. त्यामुळे आता लोकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे मुख्यमंत्रीही संतप्त झालेले दिसत आहेत.
 
जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत. तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलीसांशी हुज्जत घालत आहेत. त्यांनी कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी थेट प्रसारणाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला केले. तसेच अजूनही गर्दी थांबवा, कठोर पावले टाकायला भाग पाडू नका असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
सर्वांचे सहकार्य
 
आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडविले आहे ते पुढेही काही दिवस कायम ठेवा, घरात राहा, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळातील सहकारी, राज ठाकरे हे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहोत, असेही ते म्हणाले.
 
मदतीचे अनेक हात
 
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. उदय कोटक यांनी १० कोटी रुपयांची मदत केली आहे. कंपन्या, उद्योजक पुढे येत आहेत, कुणी रुग्णालय सेटप उभे करत आहे, तर कुणी मास्क पुरवित आहे. एक चांगली टीम या निमित्ताने तयार झाली आहे, काम करत आहे.
 
जिथे आहात तिथेच थांबा
 
इतर राज्यातून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांनी आहे तिथेच थांबावे, महाराष्ट्र शासनाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी १६३ केंद्रे सुरु झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय केली आहे.
 
… तर सीएमओशी संपर्क करावा
 
महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यात अडकले असतील त्यांनी तिथेच राहावे, अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करावा, त्यांना संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत उपलब्ध करून दिली जाईल.
 
जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरु
 
कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक वस्तू, औषध दुकाने आणि सेवा बंद केल्या नसल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी होणारी गर्दी कमी करावी, यंत्रणेवरचा ताण वाढवू नये असेही त्यांनी आवाहन केले.
 
पाच रुपयांत शिवभोजन
 
 
आरोग्याशी संबंधित ही लढाई असल्याचे सांगून एकत्रित प्रयत्नांतून आपल्याला ती जिंकायची आहे, त्यासाठी जबाबदारीने वागायचे आहे. राज्यातील शिवभोजन केंद्रात कार्ड असो वा नसो, आता पाच रुपयात लोकांना पुढचे तीन महिने जेवण देण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
डॉक्टरांनीच मनोधैर्य वाढवले
 
कस्तुरबा आणि नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझेच मनोधैर्य वाढले. इतक्या चांगल्या प्रकारे आरोग्य सेवेतील लोक काम करत आहेत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, जीवनावश्यक सेवा देणारे सर्व लोक हे खरे शूरवीर आहेत, मला त्यांचा अभिमान वाटतो, जीवावर उदार होऊन ते काम करत आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
 
राज्यात चाचणी केंद्रे वाढली
 
 
राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत, त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहेच. परंतु, अपेक्षेपलीकडे ही संख्या जाता कामा नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खासगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणाऱ्यांवर उपचार करावेत. तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठवावे कारण लक्षणाची तीव्रता कमी असतानाच आपण त्यावर विजय मिळवू शकतो.
 
'होम क्वारंटाईन'नी घराबाहेर पडू नये
 
 
होम क्वारंटाईन लोकांनी कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी स्वत: घरातच राहावे. घरातील ६० वर्षांवरील माणसे, गरोदर स्त्रिया, मधुमेह, उच्च रक्तदाब असलेली माणसे यांना जपावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
युद्ध नक्कीच जिंकू
 
 
विषाणूचा गुणाकार न होऊ देता त्याची वजाबाकी करावयाची असल्याने हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. विषाणूला हरवण्यासाठी संयम, जिद्द कायम ठेवावी, आपण हे युद्ध नक्की जिंकू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@