मुंबई : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे रुग्ण राज्यभरात वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असताना एक चांगली बातमी आहे. राज्यामधील ३४ रुग्ण चांगले झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली.
जगभरात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे. या विषाणूने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १९६ झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ०३, रत्नागिरी ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३, सांगली (मिरज) २५, सातारा ०२, सिंधुदुर्ग ०१, कोल्हापूर ०१, जळगाव ०१, बुलडाणा ०१ असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाकडून रुग्णांची चांगल्याप्रकारे काळजी घेतली जात असल्याने ३४ रुग्ण कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झाले आहेत. त्यात मुंबईमधील १४, पुणे येथील १५, नागपूर येथील ०१, औरंगाबाद येथील ०१, यवतमाळ येथील ०३ रुग्णांचा समावेश आहे. ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने व ७ जणांचा मृत्यू झाल्याने १५५ रुग्ण राज्यभरात उपचार घेत असल्याचे आरोग्य मंत्र्यानी सांगितले आहे.