लॉकडाऊन काळात देशभरात टोलवसुली बंद

26 Mar 2020 11:03:48

toll_1  H x W:



केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरींची घोषणा


दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आपतकालीन वाहतूकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. तसेच सुविधा गतीमान व्हावी या हेतूने राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारणी होणार नाही, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.


नितीन गडकरी म्हणाले की, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आपतकालीन सेवेतील व्यत्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल आकरणी करु नये, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आपतकालीन सेवा पुरवणाऱ्यांना लोकांना जलद गतीने सेवा पुरवणे सुलभ होईल.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा ६०० हून अधिक झाला आहे. यात ४० हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा दिवसागणिक वाढत असलेला आकडा नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तीन आठवडे नागरिकांनी घरात बसून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मोदींनी केले आहे.


लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा आणि जीवनावश्य वस्तूची सुविधा खंडीत होणार नाही, असे आश्वासन राज्य सरकार तसेच केंद्रसरकारकडून नागरिकांना देण्यात आले आहे. लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतल्यानंतर गरजेच्या वस्तुंचा पुरवठा करण्याचे मोठे आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर असेल. २१ दिवस नागरिकांना घरी बसवण्यासाठी त्यांना दैनंदिन वापरातील वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी करावी लागणाऱ्या कसरतीमध्ये केंद्राने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.


Powered By Sangraha 9.0