लष्कराला बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

26 Mar 2020 16:59:59

ajit pawar_1  H

जीवनावश्यक वस्तू सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन व्हावे

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठीनागरिकांनी घरातच राहणे, जमावबंदीचा आदेश असताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन असतानाही डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त आणि संयम पाळावा. लष्कराला बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
 
 
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, प्रतिबंधात्मक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0