मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारसह मुंबई महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे, वर्दळीच्या रस्त्यांवर कोरोना जंतूनाशक फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान ही फवारणी करत होते.
महाराष्ट्रात आता कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १०७ वर जाऊन पोहोचला आहे. कोरोना व्हायरसची लागण गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी सर्वात जास्त होते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान रुग्णालय, सार्वजनिक ठिकाण, बसगाड्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
परळ येथील के.ई.एम रुग्णालयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाण्यात सोडिअम हायड्रोक्लोराईड मिसळून त्याची क्विक रिसपाॅन्स गाड्यातून परिसरात फवारणी केली आहे. अशा प्रकारे इतर ठिकाणीही मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी डाॅ. प्रभात रंहागदळे यांनी दिली.