केइएमसह पालिका रूग्णालयांच्या परिसरात निर्जंतुकीकरण करणार
मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता आता सरकार अधिक सक्षमतेने त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आज सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा १०१ पर्यंत पोहचला आहे. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये प्रामुख्याने परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये हा जीवघेणा विषाणू आढळला. मात्र जनसामान्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून सामाजिक जनजागृती, संचारबंदी ते अगदी आता विविध भागांचं निर्जुंकीकरण करण्यापर्यंत उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी मुंबई अग्निशमन दलाकडून महानगरपालिका रूग्णालयाच्या आवारात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पाण्यामध्ये सोडियम हायड्रोक्लोराइड मिसळून क्वीक रिस्पॉन्स व्हेईकलच्या माध्यमातून त्याचा फवारा केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या क्वारंटाईनची सोय देण्यात आलेल्या भागामध्ये याला प्राधान्य देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा हा शहरी भागांपैकी मुंबई मध्ये सर्वाधिक आहे. सध्या कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी राज्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.