मुंबई : कोरोनाचा आणखी एक फटका मंगळवारी बसला. राज्यात काही रुग्ण कोरोनामुक्त होत असताना दररोज कोरोना संशयित मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मंगळवारी राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच तो दुबईहून १५ मार्च रोजी भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेमध्ये आणि नंतर मुंबईमध्ये आला होता. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. २३ मार्चला त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
ज्येष्ठ नागरिकांची घ्या काळजी
कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू पावलेले सर्व ५५ वर्षांच्या पुढील आहेत. शिवाय त्यांना विविध आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठांना सांभाळणे महत्त्वाचे ठरत असताना शासनाच्या सूचनांचे पालन करून सर्वांनी घरीच थांबणे आवश्यक आहे.