१०७ जणांना कोरोनाची लागण; नवीन पाच जणांची चाचणी पॉझिटिव्ह
मुंबई : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने दहशत माजवली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५०हून अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रागत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर पोहचली आहे. राज्यात आज ६ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील पाच रुग्ण हे मुंबईमधील असून एक रुग्ण अहमदनगरचा आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०१ होती. परंतु, दुपारपर्यंत यात आणखी ६ रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४५०पेक्षा अधिक झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. देशात ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाऊन करण्यात आले आहेत. तसेच काही राज्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या भीतीने मुंबई-पुण्यातील नागरिक गावाकडे धाव घेत आहेत. अशा नागरिकांकडे संशयातून पाहू नका, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.