मुंबई : मुंबईत होम क्वारंटाइनमधून पळालेल्या १५ संशयितांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे १५ संशयित खारमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आमच्या पथकाने रेल्वे स्टेशनवर धाव घेतली आणि दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांना पकडून पालिका अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आलं. या सर्वांच्या हातावर क्वॉरंटाइन स्टँम्प लावलेला होता,असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कब्दुले यांनी सांगितले.
हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते.हे सर्व मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. तसेच कॅम्पमधून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. तिथेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ८९ झाली आहे, तर कोरोनामुळे महाराष्ट्रात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन आणि जमाव बंदी जारी करण्यात आली आहे.देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३८७वर पोहोचली आहे.