नवी दिल्ली : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आता याच पार्श्वभूमीवर ज्या शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे अशी शहरे तात्काळ लॉकडाऊन करण्यात यावी अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरे पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील जनता आज स्वतःच्या घरात आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या घरातच राहिल्यास संसर्ग होण्याची साखळी रोखता येणे शक्य आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा सल्ला केंद्राने दिला. दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर, मुंबई आणि पुण्यात अगोदरच अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.लॉकडाऊन दरम्यान सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, मॉल, काराखाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतात. तर, भाजीपाला, दूध आणि दररोज लागण्याच्या आवश्यक गोष्टींची दुकाने, तसेच मेडिकल स्टोअर उघडी राहतात.