अभिनेता अक्षय कुमारकडून नागरिकांना आवाहनमुंबई : कोरोना विषाणूचा परिणाम जगभर दिसून येत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून जनजागृतीचे काम सुरु आहे. अशामध्ये बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी देखील स्वत:हून पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. तसंच, कोरोनाविरोधातील शर्यत आपल्या सर्वांना एकत्रित जिंकायची आहे, असे त्याने सांगितले आहे.
अक्षय कुमारने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, 'मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांना सेल्फ क्वॉरंटाईन स्टॅम्प लावून घरात किंवा हॉटेलमध्ये पाठवले जात आहे. या लोकांना दोन आठवडे इतर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी सांगितलं जात आहे. मात्र ही लोकं देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत. लग्न समारंभ, पार्ट्यांमध्ये जात आहे. ते लोकं फक्त स्वत:चे नाही तर दुसऱ्यांचे आयुष्य देखील संकटात टाकत आहेत.'
अक्षय कुमारने पुढे असे देखील सांगितले आहे की, 'कोरोना विषाणू सुट्टीवर नाही. तो खूप जोरात काम करत आहे. या शर्यतीत तो आपल्या पुढे आहे. पण ही शर्यत अद्याप संपलेली नाही. आपण सुद्धा ही शर्यत जिंकू शकतो. आपल्याला विजय मिळवावा लागेल. ही अशी शर्यत आहे ज्यात पहिला थांबणारा जिंकणार आहे. त्यामुळे या शर्यतीत एकतर सगळे एकत्र जिंकतील किंवा सगळे एकत्र हारतील' असे सांगत अक्षय कुमारने सर्वांना घरात थांबण्याचा सल्ला दिला आहे.