मुंबई : अलिबागमधील मांडवा जेट्टीपासून जवळच एक प्रवासी बोट शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उलटली. यामध्ये ८८ प्रवासी गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला निघाले होते. त्यावेळी अचानक खडकावर आदळून हा अपघात झाला. यावेळी मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांच्या प्रसंगावधानामुळे ८८ जणांचे प्राण वाचले.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून शनिवारी सकाळी ९च्या सुमारास ही बोट सुटली होती. यावेळी जेट्टीजवळ बोट पोहचली असताना एका दगडाला लागून बोटीमध्ये पाणी घुसू लागले. त्यानंतर बोट एका बाजूला झुकल्याने बोटीमध्ये पाणी घुसू लागले. यासर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घाबरगुंडी उडाली होती. यावेळी पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी इतर पोलीस आणि मच्छिमारांच्या साथीने प्रवाशांना धीर देऊन सुखरुप बाहेर काढले. मच्छीमार आणि पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडू शकला असता, असे प्रवाशांनी यावेळी सांगितले.