कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने कुवेत आणि इटलीला जाणारी विमानांची उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिआ, फ्रान्स, जर्मनी, इस्राईल आणि श्रीलंकेला जाणाऱ्या विमानांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एअर इंडियाने २८ मार्चपर्यंत इटलीला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. तसेच त्याचबरोबर एअर इंडियाने दक्षिण कोरियाला जाणारी विमाने देखील २५ मार्चपर्यंत रद्द केली होती.
भारतीय उपखंड सोडून अन्य देशांमध्ये करोना विषाणूने उद्रेक केला आहे. यामुळे अनेक भारतीय नागरिक तेथून संसर्ग घेऊन विमानाने मायदेशात परतत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत प्रवाशांनीही मोठ्या प्रमाणात विमानतळाकडे पाठ केली आहे. परिणामी विमान प्रवासी संख्या २४ टक्क्यांनी घटली आहे. दुसरीकडे व्यापार आयातीलाही २४०० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे विमान तिकिटांवर माफक शुल्क लावून नुकसान भरून काढू द्यावे, अशी मागणी खासगी विमानतळमालकांच्या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे.
दरम्यान, काल एअर इंडियाच्या विमानाने मिलान इथून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरु आहेत. विमानातले कर्मचारी आणि पायलट यांनाही १४ दिवासांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. तसेच इराणमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या ४४ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहचले. या विमानातून आलेल्या सर्व भारतीय नागरिकांना घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात १४ दिवस, स्वतंत्र कक्षात, वैद्यकीय देखरेखी खाली ठेवले आहे. हे सर्व भारतीय कोरोना विषाणूच्या तपासणीत बाधित नसल्याचे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी सांगितले आहे.